श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या पोटातून तब्बल १५ किलो वजनाची सर्जरी करून यशस्वीरित्या जनरल सर्जन डॉ. रंणजीत भोजने व त्यांच्या टीमने काढून मोठे वैद्यकीय यश संपादन केले त्या टीमचे सर्वत्र कौतुक

शिर्डी : (प्रतिनिधी)श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये पोटातील १५ किलो वजनाची गाठ काढून यशस्वी शस्त्रक्रिया
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल येथे जनरल सर्जरी विभागात अत्यंत जटिल व धाडसी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. सुमारे 32 सेंटीमीटर आकाराची आणि अंदाजे 15 किलो वजनाची पोटातील गाठ रुग्णाच्या शरीरातून सुरक्षितपणे काढण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
जळगाव येथील मायाबाई राठोड (वय 46) या गेल्या तीन वर्षांपासून पोटाच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्यांनी शिर्डी येथे उपचारासाठी धाव घेतली. जनरल सर्जन डॉ. रणजीत भोजने यांनी तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
डॉ. रणजीत भोजने यांच्या नेतृत्वाखाली तसेच भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. जनरल ओटी विभागातील विद्या कदम, निलेश रावस, शहनाज पठाण, योगिता डालोरे, बाळासाहेब मोगल, गौतम मोकळ, रवी निर्मळ, बाळू डांगे या प्रशिक्षित वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या अचूक नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली.
सदर शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली असून रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक तसेच उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.




